Skip to main content

सफर राज्याच्या वाईन कॅपिटलची

          

सफर राज्याच्या वाईन कॅपिटलची  


सध्या रोजचं वर्तमानपत्रांमध्ये सावरकरांच्या माफीनाम्यावरून पेटलेलं वाक्युद्ध पहाते तेव्हा तेव्हा मला आमची नाशिकची ट्रिप आठवते. वाटतं की  जे जे कोणी आपापल्या परीने आणि बौद्धिक कुवतीनुसार सावरकरांविषयी गरळ ओकतायंत,त्यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या माफीनाम्याचा पूर्ण संदर्भ  समजून न घेता त्यांच्यावर लांच्छन लावतायंत,त्यांना जर का त्यांच्या जन्मस्थळी नेलं तर  कदाचित सावरकरांच्या देशभक्तीवर,त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या अफाट त्यागावर संशय घेण्याची ह्या थोर मंडळींना यत्किंचितही इच्छा होणार नाही.पण जसं तुकाराम म्हणतात," मूढा सांगणे न लगे " .... असो...  

आमची लेक जसजशी विवाहयोग्य वयाकडे जवळजवळ सरकतेय तसतसं तिच्या लग्नासाठी काय वेगळं करता येईल असे विचार अध्येमध्ये मनात डोकावत असतात. सध्या डेस्टिनेशन वेडींग्सचं भलतंच पीक आहे त्याच अनुषंगाने कोणतंही मॅगझीन किंवा पेपरमध्ये एखादं सदर त्यासंदर्भात आलेलं असेल तर मग आवर्जून वाचणं होतंच .अशाच एका सदरामध्ये नाशिकच्या सुला वाईनरीबद्दल छापून आलं होतं. मगअसं एखादं डेस्टिनेशन जे साधारण आपल्यातुपल्या मध्यमवर्गीयांच्या खिशाला कदाचित परवडू शकेल असं वाचनात आलंच तर मग  ते खरोखरच आपल्या खिशाला परवडेल की नाही,व्यवस्था कशी आहे इत्यादी इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष नजरेखालून घालून त्याची शहानिशा करणं आम्हाला कधीही जास्त श्रेयस्कर वाटतं.निमित्त्य सुला वाइन्सचं झालं खरं पण ह्या सुला वाईनरीच्या निमित्त्याने आम्हाला नाशिक रुपी खजिनाच जणू हाताशी लागला. 

 प्रभू श्रीरामांची आणि अगस्ती ऋषींची पावन तपोभूमी,जिथे पंचवटीमध्ये रामाने आपल्या वनवासातला जास्तीत जास्त काळ व्यतीत केला आणि इथेच तपोवनात लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचं नाक कापलं,असं अतिशय संपन्न अशी पौराणिक पार्श्वभूमी लाभलेलं आपल्या महाराष्ट्राच्या गंगेचं म्हणजे गोदावरीचं उगमस्थान  ...नाशिक. किती किती गोष्टी जोडलेल्या आहेत या एका जिल्ह्याशी.वीर सावरकर,अनंत कान्हेरे,दादासाहेब पोतनीस,कुसुमाग्रज,माधवराव लिमये,बहिणाबाई चौधरी आणि वसंत कानेटकरअशा एकाहून एक श्रेष्ठ प्रतिभासंपन्न कर्मयोगींची आणि साहित्यिकांची जन्मभूमी. महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचा हा जिल्हा.नाशिक एका बाजूने गुजरात मधल्या डांग जिल्ह्याशी आणि एका बाजूला धुळे,औरंगाबाद ,अहमदनगर ह्या जिल्ह्यांनी वेढलेलं आहे.त्यामुळे नाशिकमधूनच आपल्याला गुजरातमधल्या एकमेव हिलस्टेशनला म्हणजे सापुताऱ्याला सुद्धा जाता येतं. 

आम्ही सगळेच इतिहासप्रेमी असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक वास्तूचा किंवा एखाद्या गड किल्ल्याचा आमच्या ट्रीपमध्ये समावेश नसणं हे केवळ अपवादानेच होतं.त्यामुळे ह्या ट्रीप मध्येही आम्ही शोधला किल्ले हातगड आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर.

नाशिकच्याच रस्त्यावर आपल्याला इसवीसनपूर्व  १ ते इसवीसन ३ च्या शतकातील कोरलेल्या पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेण्यांच्या २४ गुहा पाहता येतात.ही लेणी सातवाहन राजा सातकर्णीने क्षत्रप नहपानाला हरवल्यानंतर बौद्ध भिक्षूंना दान केली.ह्यात अजिंठा आणि वेरूळच्या बौद्ध लेण्यांसारखेच वेगवेगळे चैत्यगृह आणि विहारकक्ष  आहेत. तिसरी गुहा बाकीच्या लेण्यांच्या मानाने बऱ्यापैकी  सुस्थितीत आहे.

नाशिकच्या अंगणात बरेच गड किल्ले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रातला जास्तीत जास्त किल्ले राखून असलेला एकमेव जिल्हा म्हणून नाशिक आपला लौकिक टिकवून आहे.जवळपास ६२ हून जास्त छोटे मोठे गड किल्ले  नाशिकला लाभलेले आहेत. मुघलांची  तिजोरी आणि एक प्रमुख व्यापारी केंद्र सुरत ते बुऱ्हाणपूर व्यापारी मार्गाशी असलेल्या सान्निध्यामुळे नाशिकमधल्या बागलान प्रांताला शिवकालीन इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्याच्या उद्देश्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या बागलान प्रांतात न्हावीगड,साल्हेर,हातगड,सालोटा,मुल्हेर असे पाच महत्वाचे आणि मोक्याचे किल्ले बांधले.साल्हेरच्या किल्ल्याची लढाई तर सगळ्यांनाच परिचित आहे. त्या पाच किल्ल्यांतला सुरगाणा तालुक्यात नाशिक-सुरत महामार्गाला लागूनच सह्याद्री पर्वतरांगांमधल्या  सातमाळा उपपर्वतरांगेच्या सुरुवातीला वसलेला  भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा पण चढायला सोपा किल्ला असा हा हातगड.गडाच्या चार प्रवेशद्वारांपैकी पहिल्या प्रवेश  द्वारापाशी आपल्याला निजामकालीन शरबशिल्प आणि दोन शिलालेख कोरलेले आढळतात. भैरवसेन  बागुल राजाने बुऱ्हाण निजामशहाकडून १५४८ मध्ये हा गड जिंकून घेतल्याची नोंद ह्या हातगडावरच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर कोरलेल्या शिलालेखात आढळते.१६ ओळींचा हा शिलालेख ,इतिहासकालीन शिलालेखांमध्ये  सगळ्यात लांब आणि संस्कृतमध्ये लिहिला गेलेला असा एकमेव शिलालेख आहे.मधल्या काळात पुन्हा निजामशाहीत गेलेला हा किल्ला शिवाजी महाराजांचे सरदार गंगोजी मोऱ्यांनी १५८६ मध्ये सुरतेच्या लूटीदरम्यान मुघलांकडून परत मिळवला.आज जरी गडावर पेशवेकालीन मुदपाकखाना,तोफखाना,दारुगोळ्याचं कोठार,धान्याचं कोठार,किल्लेदाराच्या खोल्या,पाण्याच्या टाक्या,शिवमंदीर अशा प्राचीन वास्तूंचे फक्त भग्नावशेष शिल्लक असले तरी हे अवशेष ह्या हातगडाची इतिहासकालीन आण-बाण-शान समजायला पुरेसे आहेत.ह्या हातगडा पासून काही किलोमीटर अंतरावर असलेली गुजरातची हद्द ओलांडून आम्ही सापुताऱ्यात पोहोचलो.सापुताऱ्याची ओळख एक थंड हवेचं ठिकाण अशी असली तरी इथलं आदिवासी संग्रहालय पाहण्यासारखं आहे.

नाशिकपासून थोड्याच अंतरावर आहे ,आपल्या प्रत्येक मराठी माणसाचं आराध्यादैवत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचं जन्मस्थान भगूर .कसेबसे वाट शोधत आम्ही भगूरला पोहोचलो.सावरकरांच्या ह्या मूळ घराची डागडुजी करून त्याला आपल्या महाराष्ट्र सरकारने पुनरुज्जीवीत केलंय.ह्या वाड्यामध्ये सावरकरांचा जीवनपट आणि त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील कार्य वेगवेगळ्या छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडलेलं आहे.त्या प्राचीन वास्तूकडे नुसतं बाहेरून पाहताना देखील आपल्या क्षुद्रपणाची आपल्याला लाज वाटते तर वास्तूत फिरताना आपला कण न कण  शहारतो.त्यांच्या जीवनकार्याबद्दल वाचताना आपल्याला त्यांच्या नखातल्या मातीचीही सर नसल्याचं अतिशय तीव्रपणे जाणवतं. त्या नीरव वास्तूचं पावित्र्य,तिथली शांतता आपल्या मनाला फक्त स्पर्शूनच नाही तर भेदून जाते आणि  आपण आपोआपच नतमस्तक होतो.सावरकरांनी देशभक्तीपोटी केलेल्या त्यागाला आणि सोसलेल्या अनन्वित अत्याचारांना,हालअपेष्टांना तर तोड नाही.अशा वेळी रोज उठून त्यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या,त्यांच्याबद्दल उलटसुलट बोलणाऱ्या वक्त्यांच्या बुद्धिसामर्थ्याची तर फक्त आणि फक्त कीवच करावीशी वाटते. खरंतर त्यांच्यासारखा प्रखर राष्ट्रभक्त ह्या पृथ्वीतलावर पुनःश्च तरी होणे नाही किंबहुना कोणाचीही तितकी प्राज्ञाच नाही.आपल्यासारखे पामर किमान त्यांच्या ह्या वास्तूला भेट देऊन छोटीशी आदरांजली नक्कीच वाहू शकतात.

पण कालांतराने नाशिकची ही पौराणिक आणि ऐतिहासिक ओळख बाजूला राहून नाशिक कात टाकू पाहतंय ,आपली नवीन ओळख रुजवू पाहतंय. छोट्या मोठ्या वाइनरीज आज नाशिकचा नवीन चेहरा बनल्या आहेत. कधीकाळी भूगोलाच्या पुस्तकात ओझरच्या मिग विमानांचा कारखाना,कुंभ मेळा, त्रंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग ,भोसला सैनिकी शाळा आणि द्राक्षांच्या भरघोस पिकासाठी आपल्याला माहित असलेलं नाशिक आता आपल्या महाराष्ट्राची वाईन कॅपिटल म्हणून नव्याने नावारूपाला येतंय.वाईनरीज तर बऱ्याच आहेत,त्यातलीच एकआहे सुला वाईनरी. यूरोपमध्ये तर आम्ही बऱ्याच वाईन यार्डच्या सैरी केल्यायत पण सुला वाइनरीची व्यवस्था आणि परिसर पाहण्याच्या निमित्त्याने लगे हाथ आम्ही वाईन करण्याची नक्की प्रक्रियासुद्धा पुन्हा समजून घेतली. आजकालच्या तरुणाईला instagramable selfies घेण्यासाठी बरेच प्रॉप्सही सुलामध्ये आहेत.Cheese n Wine असं कॉम्बिनेशन खूप प्रचलित असल्यामुळेच बहुदातरी,ह्या वाईनरीजच्या रस्त्यावर  cheese फॅक्टरीज सुद्धा आमच्या नजरेस पडल्या.ज्यांना cheese तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल कुतूहल असेल ते अशा cheese फॅक्टरीला भेट देऊ शकतात.

पण आमच्यासारख्या भटक्यांना निव्वळ एका भेटीत नाशिक पाहता येण्यासारखं नाही.
ये तो सिर्फ  trailor  हैं  picture  तो अभी बाकी है मेरे दोस्त !


माधुरी गोडबोले-माईणकर
www.valuevacations.co.in

२४ जानेवारी २०२०



  

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णा

  अन्नपूर्णा   सध्या रणवीर अलाहाबादीया सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र झळकतोय,पण माझा रणवीर अलाहाबादीयाशी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा परिचय झाला तो त्याच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून,प्रसिद्ध गिर्यारोहक बलजीत कौरने अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर त्याने तिची घेतलेली मुलाखत ऐकण्याच्या निमित्त्याने. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोन empty nesters जोडपी जुन्नरला वीकेंड ब्रेकला गेलो होतो. ऑगस्टचा महिना होता,संध्याकाळची वेळ होती,छान भुरुभुरु हलका पाऊस पडत होता आणि वातावरण मस्त कुंद झालं होतं.वाफाळत्या चहावर आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.गिर्यारोहणाशी आमचा संबंध तुटल्याल्या बरीच वर्षं उलटली होती म्हणजे आम्ही काही व्यावसायिक पातळीवरचे गिर्यारोहक नव्हतो किंवा नाही पण हौशी गिर्यारोहक म्हणता येईल.कॉलेजच्या दिवसानंतर आता पुन्हा आपल्या त्या छंदाला जीवंत करावंसं मनात आलं त्यामुळे आमच्या जुन्नरच्या छोट्याशा ब्रेकमध्ये सुद्धा आम्ही दोन गडांच्या दोन छोट्या सफरी बरेच वर्षांनंतर करणार होतो.पण गड,किल्ले पुन्हा चढायचे तर तेवढा शारीरिक फिटनेस हवा. ह्याच गप्पांच्या ओघात अचानक मित्राने खिशातून त्य...

ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ )

  ज़न्नत -ए -कश्मीर (भाग २ ) एव्हरेस्ट बेस कॅम्पची ट्रेक जरी कर्मधर्म संयोगाने घडली असली तरी दोन तीन ट्रेक्स अशा आहेत ज्या फार आधीपासूनच माझ्या बकेट  लिस्टमध्ये जागा पटकावून होत्या.त्यातलीच एक काश्मीर ग्रेट लेक्स.गेल्या काही वर्षांत तर ही ट्रेक तिच्या निसर्गसौंदर्यामुळे ट्रेकर्स च्या खूपच पसंतीस उतरलेली त्यामुळे ट्रेक्सची बुकिंग्स ओपन व्हायचा अवकाश आणि त्या फुल्ल होतात. पण एकदा एक ठराविक वय उलटलं की प्रत्येक वर्षी तब्येतीची समीकरणं बदलण्याची किंवा नको ते पाहुणे शरीरात आश्रयाला येण्याची भीती खूप दाट. त्यामुळे हिमालयातली कोणतीही हाय अल्टीट्युड ट्रेक करायची तर स्वतःला शारीरिक ताकद,धडधाकटपणा,चिकाटी ह्या आणि अशा बऱ्याच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या निकषांवर स्वतःला चाचपून मगच निर्णय घ्यावा लागतो.फार आधीपासून किंवा अगदी शेवटच्या क्षणी निर्णय घेणं शक्य होत नाही.पण वाटलं सध्या तरी तब्येतीचं सगळं काही आलबेल आहे तर तिथपर्यंत हात धुऊन घेतलेले बरे.काही ठिकाणंच अशी असतात की कितीही वेळा गेलात तरी मन भरत नाही.ज्यांना मधुबालाच्या सौंदर्याची नशा कळली त्यांना काश्मीरची नशा कळेल.जग म्हणतं,काश...

ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १)

  ज़न्नत-ए-कश्मीर (भाग १) "Travel is the only expense that makes you rich", अशी एक उक्ती आहे.....आणि ते खरंही आहे.आमच्या प्रत्येक सहलींमधले अनुभव,त्यात भेटणाऱ्या व्यक्ती कायमच आमचं जगणं समृद्ध करत आले आहेत.आपल्या प्रसारमाध्यमांवर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून दाखवल्या जाणाऱ्या मथळ्यांमध्ये फारसं काही तथ्य नसतं हे जरी माहित असलं तरी रोज वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काश्मीरबद्दलच्या उलटसुलट खबरांमुळे आणि मागच्या महिन्यात झळकलेल्या "काश्मीर फाइल्स"ने काश्मीरची सुट्टी ठरवताना काहीसं कुतूहल,उत्सुकता आणि काहीशा भीतीने आच्छादलेल्या विचारांचा एक अजबच कोलाहल होता डोक्यात.वास्तविक पहाता दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरमध्ये हजेरी लावतात,म्हणजे काश्मीर " याचि देही याचि डोळा " पाहण्याची मनीषा उराशी बाळगणारे आम्ही खरंतर काही एकटे नव्हे तरीसुद्धा एकंदरीतच "सुरक्षा" ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब होती.पण खूप विचारविनिमयाअंती काश्मीरलाच सुट्टीला जाण्यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र पिंजून काढण्यासारखी हटके ठिकाणं हुडकण्यापासून घेऊन...