Skip to main content

दख्खनच्या जंगलवाटा

दख्खनच्या जंगलवाटा 

कधीकधी काही ठिकाणं अगदी योगायोगानेच पहिली जातात.नाही तर मुद्दाम वाट वाकडी करून ती पाहायला जाण्याचा आपण सहसा विचार करत नाही किंवा करणारही नाही कदाचित.नेमकं असंच काहीसं झालं जेव्हा आम्ही कूर्ग पहायचं ठरवलं. क्लब महिंद्राची मेम्बरशिप घेतल्यापासून आम्ही त्यांच्या कूर्गच्या प्रॉपर्टीचं बरंच कौतुक ऐकून होतो त्यामुळे ती प्रॉपर्टी पाहण्याचं कुतूहल तर होतंच,पण एखादं ठिकाण ठरवल्यावर आसपासची फारशी वाट न चोखाळली गेलेली ठिकाणं हुडकून काढणं आता काहीसं सवयीनेच होतं. त्यामुळे तेव्हा मसिनागुडी आणि येरकऊडचा समावेश आपसुकच झाला.ठिकाण कोणतंही असू दे,भारतात किंवा भारताबाहेर आमचा बराचसा भर हा "Being Glocal" वर असतो.ह्या तत्त्वाला अनुसरून आम्ही प्रत्येक ठिकाणी खाजगी वाहन वापरण्याऐवजी किंवा भाड्याने घेण्याऐवजी शक्य तितकं आणि शक्य असेल तिथे,त्या भागात वापरल्या जाणाऱ्या आणि उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतुकीची माध्यमं वापरण्याचा प्रयत्न करतो आणि पसंतही करतो ज्याच्यामुळेआम्हाला भटकंतीचा खराखुरा आनंद मिळतो. याव्यतिरिक्त तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधणं,त्यांचं जीवन जवळून पहाणं,त्यांच्या मदतीने तिथली फारशी परिचित आणि ऐकीवात नसलेली ठिकाणं पहाणं आणि त्या ठिकाणांची सहजासहजी पुस्तकांमध्ये न सापडणारी माहिती करून घेणं असे अनेक आनुषंगिक फायदेही मिळतात,जे भटकंतीची रंगतअजून वाढवतात.आता हं,हे असं भटकणं म्हटलं तर थोडं दगदगीचं असू शकतं,विशेषतः भारतात फिरताना But it's worth it ! 


कूर्गला जायचं ठरलं तेव्हाही आम्ही विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवास पसंत केला. ट्रेनची वेळसुद्धा पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने जास्त सोयीची होती. अगदी चक्क ठरल्या वेळी सकाळच्या न्याहारीच्या वेळेआधी ट्रेनने बरोबर आमचं बोचकं मँगलोर रेल्वे स्टेशनवर टाकलं.तेव्हा Ola , Uber इतक्या बोकाळलेल्या नव्हत्या पण आपल्याकडच्या प्रीपेड टॅक्सीसारखी मँगलोर स्टेशनच्या बाहेर प्रीपेड रिक्षांची सोय आहे. ट्रेनच्या रात्रभराच्या प्रवासात समोरच बसलेल्या कुटुंबाशी आमचे सकाळपर्यंत चांगले सूर जुळले आणि योगायोगाने तेही क्लब महिंद्राचेच मेंबर होते. त्यामुळे कूर्ग नंतर आपापल्या पुढच्या प्रवासाला पांगेपर्यंत ते आमचे आपोआपच ट्रॅव्हल कंपॅनिअन झाले. मँगलोरला अस्सल उडपी नाश्त्याचा समाचार घेऊन आम्ही सगळ्यांनी कारने कूर्गची वाट धरली,कूर्ग थंड हवेचं ठिकाण म्हणून जास्त माहित असलं तरी ते कॉफीचे मळे,मसाल्याच्या पदार्थांच्या बागा आणि जवळच असलेलं एक प्रमुख शहर मडिकेरी मुळे तितकंच परिचित आहे.काहीही स्थलदर्शन करायचं असल्यास मडिकेरी शिवाय पर्याय नाही. मडिकेरीपर्यंत गेल्यावर मगच तिथून आपल्याला बऱ्याचशा जंगल ट्रेक्स,ओंकारेश्वराचं देऊळ,मडिकेरीचा किल्ला,abbey फॉल्स सारख्या आणि अशा इतर अनेक पर्यटन स्थळांपर्यंत जाणं सोयीचं होतं . 



मडिकेरी बस स्टॅन्ड वरून म्हैसूर,ऊटीकडे दर थोड्या वेळाने सुटणाऱ्या बसेस आहेत.अशाच एका ऊटीकडे जाणाऱ्या बसने आम्ही मसिनागुडी गाठायचं ठरवलं.मडिकेरीकडून म्हैसूर मार्गे ऊटीकडे जाणारी बस म्हैसूरपर्यंत बंदीपूरच्या जंगलातून जाते .अगदी अगदी २००४ ला पोलिसांकडून ठार मारलं जाईपर्यंत ह्या जंगलात वीरप्पनने हैदोस माजवला होता. जाणा येणाऱ्या प्रवाशांची लूट नवीन नव्हती.त्यामुळे हा मार्ग फारसा सुरक्षित नव्हता.लोकांमध्ये वीरप्पनची दहशत होती त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या ह्या रस्त्याचा प्रवास लोकं जीव मुठीत धरूनच करत असत.पण वीरप्पनला ठार होऊन आठ एक वर्ष उलटलेली असूनसुद्धा, २०१२ मध्ये आम्ही जेव्हा बसने ह्या जंगलातून प्रवास करत होतो तेव्हाही हा जंगलाचा पट्टा ओलांडेपर्यंत बसमधे एक विचित्र शांतता भरून राहिल्याचा भास होत होता.वीरप्पनची दहशत इतक्या वर्षांनंतर सुद्धा लोकांच्या मनाचा पाठलाग करत होती की काय कोण जाणे




मसिनागुडी. तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या सीमा विलग करणाऱ्या  मायर नदीच्या काठी मुदुमलाईच्या घनदाट जंगलात वसलेलं बऱ्यापैकी unexplored  म्हणता येईल असं एक छोटसं गाव.आमचं रिसॉर्ट अगदी मायर नदीच्या ओढ्याच्या काठाशी सुबक सुंदर टुमदार आणि अस्सल जंगल स्टे चा आभास देणारं होतं.रिसॉर्टवरच्या छोट्या छोट्या रो हाऊसेसची रचनासुद्धा जंगल स्टे ला साजेशी अशीच होती.रो हाऊसेसची मागची बाजू थेट नदीच्या छोट्या ओढ्याकडेच उघडत होती.तिथेच मागच्या बाजूला बाहेरच शॉवर बाथ वगैरे दिलं होतं.मोकळ्या वातावरणात निसर्गाशी गुजगोष्टी करत जंगलात प्रातःर्विधी किंवा आंघोळ केल्याचा आनंद लोकांनी घेणं अपेक्षित असावं बहुदा रिसॉर्ट व्यवस्थापनाला."रात्री अपरात्री तुम्हाला जाग आलीच तर रो हाऊसच्या मागे चिकटून असलेल्या ह्या ओढयावर रात्री पाण्यासाठी जंगलातली जनावरं,विशेषतः हत्ती वगैरे सर्रास येतात,तेव्हा जर का तुम्हाला पहायचं असेल तर खोलीत मंद दिवा सुरु ठेवून तुम्ही पाहू शकाल ",असं पिल्लू  खोलीत आमचं सामान ठेवता ठेवता रिसॉर्टचा बेल बॉय सोडून गेला.ते ऐकल्यानंतर मुलांचीच नाही तर आमची सुद्धा इतकी पाचावर धारण बसली की रात्री बेरात्री तर सोडाच पण पहाटे पहाटे अगदी चांगलं फाकल्यानंतरसुद्धा खोलीबाहेर असलेल्या त्या प्रसाधनगृहात आंघोळीलाच काय तर लघुशंकेसाठीसुद्धा जाण्याची आमची हिंमत होईना.सकाळी मागच्या बाजूला खोलीबाहेर जाऊन पाहिलं तर आम्हाला हत्तीच्या पावलांचे हलके ठसे पाहायला मिळाले त्यामुळे रात्री बहुदा तरी तिथे हत्तीचा वावर झालेला असावा ह्याची पुष्टी झाली. 

प्रेम,ज्ञान आणि मदत तुम्हाला कोणाकडून,कोणत्या रूपात,केव्हा,कसं आणि कधी मिळेल हे काही सांगता येत नाही.आमच्या आतापर्यंतच्या भटकंतीने ह्याची प्रचिती आम्हाला खूप वेळा दिलीय.मसिनागुडीला आम्हाला ह्याची प्रचिती आली ती त्या रिसॉर्टवरच्या F& B मॅनेजरच्या रूपाने.मसिनागुडीला पोहोचल्यावर दिवसाचा बऱ्यापैकी वेळ मोकळा होता.तो वेळ जवळपासच्या जागा हुडकण्यात सत्कारणी लावण्याच्या उद्देश्याने आम्ही काही कार वगैरे available होतेय का त्याची कॅफेटेरियाच्या वेटरकडे चौकशी करत असताना तिथल्या  F& B मॅनेजरने बहुदा ऐकलं असावं.काय मदत हवीय म्हणून तो विचारायला आल्यावर आम्ही जेव्हा त्याला कार हवी असल्याचं सांगितलं तेव्हा तो लागलीच म्हणाला,"आता अख्खा वेळ मी मोकळाच आहे,रिसॉर्ट वर माणसंही फारशी उतरलेली नाहीत सध्या,तुम्हाला चालणार असेल तर मी माझ्या गाडीने तुम्हाला जंगल फिरवीन तुम्ही फक्त पेट्रोलचा खर्च करा". म्हणजे हे तर असंच झालं कि आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन ,कार तर कार वर त्याबरोबर guide पण फ्री.आम्हीसुद्धा लागलीच त्याची कास धरली आणि मग त्याच्याबरोबर तिथल्या आदिवासी पाड्यात फिरून आदिवासी लोकांचं राहणीमान,त्यांची घरं अगदी जवळून पहाणं,त्यांची खाद्यसंस्कृती,प्रथा,सण इत्यादींबद्दल जाणून घेणं,शिवाय त्या जंगलात वावरणारे प्राणी,त्यांची स्वभाव वैशिष्टयं,behavioural patterns,सवयी ह्याबद्दलची त्याच्याकडून माहिती ऐकणं हाआमच्यासाठी एक असामान्य अनुभव ठरला जो आम्हाला कोणत्याही जंगलात किंवा अभयारण्यात बक्कळ पैसे देऊनसुद्धा कदाचित इतक्या उत्स्फूर्तपणे घेता आला नसता.त्याचा आमचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना,त्या मॅनेजरला आमच्यावर खर्चावा लागलेला वेळ,त्याचे श्रम आणि त्याने दिलेल्या त्या सखोल माहितीच्या मोबदल्यात त्याने मागितलेला पेट्रोलचा खर्च अगदीच जुजबी.कोणत्याही विशेष मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कोण,कोणासाठी,कधी आणि का इतकं करतं ह्या प्रश्नाचं मला नाही वाटत काही उत्तर असेल.पण ही अशीच "माणूस" म्हणून आपल्याला प्रगल्भ करणारी,निरपेक्षपणे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणारी माणसं,अगदी अनपेक्षितपणे आपल्या आयुष्यात गरजेच्या वेळी  आकस्मिक अवतरणं हा सुद्धा दैवी योगच,दुसरं काय .    


माधुरी गोडबोले-माईणकर 

१ जुलै २०२०       

Comments

  1. मस्त वर्णन. नुकतेच जानेवारी 23 व 24ला आम्ही कूर्ग ला होतो. त्यामुळे पुन:प्रत्ययाचा आनंद झाला.

    ReplyDelete
  2. Nice.. revived memories if our Koorg visit:)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अन्नपूर्णा

  अन्नपूर्णा   सध्या रणवीर अलाहाबादीया सगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र झळकतोय,पण माझा रणवीर अलाहाबादीयाशी दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा परिचय झाला तो त्याच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून,प्रसिद्ध गिर्यारोहक बलजीत कौरने अन्नपूर्णा शिखर सर केल्यावर त्याने तिची घेतलेली मुलाखत ऐकण्याच्या निमित्त्याने. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोन empty nesters जोडपी जुन्नरला वीकेंड ब्रेकला गेलो होतो. ऑगस्टचा महिना होता,संध्याकाळची वेळ होती,छान भुरुभुरु हलका पाऊस पडत होता आणि वातावरण मस्त कुंद झालं होतं.वाफाळत्या चहावर आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या.गिर्यारोहणाशी आमचा संबंध तुटल्याल्या बरीच वर्षं उलटली होती म्हणजे आम्ही काही व्यावसायिक पातळीवरचे गिर्यारोहक नव्हतो किंवा नाही पण हौशी गिर्यारोहक म्हणता येईल.कॉलेजच्या दिवसानंतर आता पुन्हा आपल्या त्या छंदाला जीवंत करावंसं मनात आलं त्यामुळे आमच्या जुन्नरच्या छोट्याशा ब्रेकमध्ये सुद्धा आम्ही दोन गडांच्या दोन छोट्या सफरी बरेच वर्षांनंतर करणार होतो.पण गड,किल्ले पुन्हा चढायचे तर तेवढा शारीरिक फिटनेस हवा. ह्याच गप्पांच्या ओघात अचानक मित्राने खिशातून त्य...

आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग १)

आम्ही कैलासी   -   अनुभव   सरकारी यात्रेचा   (भाग १) सात आठ वर्षांचा असेल माझा नवरा जेव्हा त्याने इंडियन एक्सप्रेसमध्ये मागे कैलास आणि पुढे मानसरोवर असा पूर्ण पानभर छापून आलेला फोटो पाहिला होता, मानसरोवर तेव्हापासून जे त्याच्या बकेट लिस्ट मध्ये घट्ट रुतून बसलं होतं ते त्या गोष्टीला पन्नास वर्षं  उलटून गेली तरीही आज तितकंच जीवंत होतं. बरं आम्ही जातिवंत हटवादी, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशा पठडीतले, त्यामुळे मानसरोवरला जाईन तर सरकारी यात्रेतूनच, ते ही लिपू लेख मार्गेच , जसे पांडव कैलासावर गेले होते तसंच. नेपाळ मार्गे वगैरे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ह्यावर त्याने आधीच खूणगाठ बांधली होती. पण २०२० मध्ये गलवान प्रकरण घडलं आणि चीनने भारतीय पर्यटकांना मानसरोवरची यात्रा करण्यापासून रोखलं. " Where are you planning to trek next in the Himalayas ?" असा प्रश्न ट्रेक संपता संपता गप्पांच्या ओघात आमच्या अन्नपूर्णा सर्किट ट्रेकच्या चमूने मला विचारला होता. त्यांच्या सहजच विचारलेल्या ह्या प्रश्नावर मी जेव्हा तितक्याच सहजपणे उत्तरले होते की  " This is my last Himalayan Tr...

आम्ही कैलासी - अनुभव सरकारी यात्रेचा (भाग ४)

  आम्ही कैलासी    -    अनुभव सरकारी यात्रेचा   (भाग ४) परिक्रमेच्या पहिल्या दिवशी दार्चेनहून आम्ही यमद्वार गाठलं.आपण जे काही पोर्टर्स किंवा घोडे मागितलेले असतात ते ह्या यमद्वारलाच मिळतात. इथे यमद्वारच्या प्रवेशद्वाराशी पोर्टर्स घोडेवाले येईपर्यंत सकाळचे दहा साडे दहा वाजतात त्यामुळे आपण जरी परिक्रमा लवकर सुरु करायची ठरवली तरी ते शक्य नाही ,बरं ज्यांना फक्त पोर्टर्स हवे असतात आणि ज्यांना घोडा आणि पोर्टर दोन्ही हवं असतं त्यांचं वर्गीकरण झाल्यावर चिठ्ठ्या पडल्या जातात , त्यात ज्याचं नाव येईल तोच पोर्टर किंवा पोर्टर आणि घोडेवाला आपल्याला घ्यावा लागतो, तुम्हाला निवड करण्याची मुभा नाही.चीनने अतिशय जाणीवपूर्वक जास्तीत जास्त स्त्रिया किंवा मुली पोर्टर्स म्हणून नेमलेल्या आहेत,ज्यातल्या काही चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या आहेत अशी गुप्तचर विभागाने आम्हाला आधीच कल्पना दिली असल्यामुळे पोर्टर मिळाल्या मिळाल्या आधी आम्ही दोघांनी त्या दोघींचे फोटो काढले. नवऱ्याची पोर्टर जेमतेम १८ वर्षांची , तिला मोडकं तोडकं इंग्लिश कळत होतं आणि तितकंच मोडकं तोडकं बोलता येत होतं. खरंतर बऱ्याचशा प...